Thursday, February 06, 2014

फुटबॉलप्रेमी गांधीजी....

दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये मोहनदास करमचंद गांधी महत्त्वाची भूमिका बजावली.



दक्षिण आफ्रिकेत १८९६ मध्ये ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या भारतीयांच्या गटामध्ये एका तरुण, दक्षिण आफ्रिकेत फारशा परिचित नसलेल्या एका वकिलाचा समावेश होता आणि ते होते मोहनदास करमचंद गांधी. मिशीगन विद्यापीठात आफ्रिकेच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या पीटर अ‍ॅलेगी यांच्या मते या खंडातील अश्वेत लोकांची ही पहिली फुटबॉल संघटना होती.
या खेळाची लोकप्रियता गांधीजींच्या लक्षात आली. हा खेळ पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसल्यावर, गांधीजी या खेळाचा वापर सामाजिक जागृतीसाठी करू लागले. ज्या वेळी सामने सुरू असत त्यावेळी गांधीजी प्रेक्षकांमध्ये फिरून पत्रके वाटत व त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करत. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळी दक्षिण आफ्रिकेच्या इनडोअर फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पुबालन गोविंदस्वामी यांनी ‘फिफा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या फुटबॉलप्रेमावर अधिक प्रकाश टाकला.
त्या काळी एकहाती विजय मिळवून देणा-या एखाद्या खेळाडूपेक्षा सांघिक भावना जपणा-या या खेळाची संकल्पना गांधीजींना अधिक भावली. संघ भावना म्हणजेच सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून देण्याची क्षमता या खेळात आहे, असे त्यांना वाटले. अधिकाधिक लोकांना हा खेळ एकत्र आणू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला ‘ट्रान्सवाल इंडियन फुटबॉल असोसिएशन’ व ‘क्लिप रिव्हर डिस्ट्रिक्ट इंडियन फुटबॉल असोसिएशन’ यांसारख्या लहान संघटना स्थापन केल्यावर १९०३ मध्ये ‘साउथ आफ्रिकन असोसिएशन ऑफ हिंदू फुटबॉल’ स्थापन करण्यात आली.

                                                                    महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील ‘टॉलस्टॉय’ आश्रमात फुटबॉल खेळला जात असे.

गांधीजी भारतात परतल्यानंतर मात्र त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले क्लब बंद पडले. तरीही भारतीय वंशाच्या लोकांनी इतर नवे क्लब सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल चालू ठेवले. दुसरीकडे भारतात परतल्यावर गांधीजींचे मतपरिवर्तन झाले. खेळांविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनात बदल झाला. भारतीयांनी खेळापेक्षा शेतीसारख्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते सांगू लागले. खेळ म्हणजे वेळ घालवण्याचे एक साधन आहे व भारतीयांनी शेतावर अधिक तास घालवले पाहिजेत आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये व त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतूनही त्यांचा खेळाविषयीचा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. मात्र, दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल संघटनांशी असलेले त्यांचे संबंध त्यांनी कायम ठेवले.

No comments:

Post a Comment